Saturday, October 24, 2009

आम्हीच का ???



निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.


हे सर्व सुरू असतानाच.. निकालांच्या दुसऱ्याचं दिवशी ठाण्यात एवढा मोठा गर्डर गाडीवर कोसळला, ठार झाले १२ जखमी झाले. मुंबईची जीवनवाहिनी जवळपास दिवसभर बंद झाली...


काय झालं... नाक चेपलेल्या गाडीपुढे अनेक बघे जमले.. आम्ही मिडीयावाले कॅमेरा घेऊन धावलो... गाडीसमोर उभे राहून बडबड केली... आमच्या चॅनलसमोर असंख्य बघे बसले.. त्यातच काही नवनिर्वाचित माननीय आमदार त्या गर्दीत आले. त्यांनी बाईट्स दिले... रेल्वेकडे आम्ही मेगाब्लॉक मागितला तो त्यांनी दिला नाही अशी रेल्वेवर आगपाखड झाली. रेल्वेनेही हात झटकले... कंत्राटदारावर कारवाई करून प्रकरण दाबायचा प्रयत्न सुरू झाला..


आर रामचंद्रन नावाचा एक मोटरमन होता तो गेला. एक प्रवासीही गेला, १२ जखमी झाले. पेपरवाल्यांनी त्यांची नावं छापली.. हे लोकही या जगात होते आहेत याचा एकमेव छापिल पुरावा राहीला. रेल्वेने मदत जाहीर केली. आणि झालं. अजून एक केस बंद झाली. गाड्या सुरू होतील ठाणे स्टेशन सोडल्यावर मुलुंडकडे जाताना अनेकवेळा त्या स्पॉटवरून जातील, सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल.. आणि मग ती हळहळ पुन्हा एकदा गर्दीत घुसमटून जाईल..


ठाण्यासारख्या अवाढव्य स्टेशनावर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा तय़ार नव्हती.. रेस्क्यू व्हॅन यायला दीड तास लागला... ठाणे फायरब्रिगेडकडे गॅसकटन नव्हता.. तो जवळच्या वेल्डींगवाल्याकडून आणावा लागला. आत माणूस अडकला आहे हे दिसत असतानाही आम्ही गॅसकटर वापरला.. अजून इतर कुठलाही कटर आमच्या कडे नव्हता.. ठिणग्या आतल्या माणसावर पडल्या.. तो मरता मरता अनेक चटके खाऊन गेला. तो मरायच्या आधी त्याचा हातही कोपरापासून काढावा लागला.. तो गेला.. गर्डर पडतोय हे लक्षात आल्यावर त्याने इमर्जन्सी ब्रेकही दाबला होता. गर्डर त्याच्या केबिनवर पडला. त्याच्या प्रसंगावधानामुळे तो मागच्या डब्यावर आला नाही... सर्वसामान्य मुंबईकर पुन्हा पुन्हा हे आठवणार.. तो आपल्या गाडीचा कितीवेळा मोटरमन असेल, त्याने कित्येकवेळा आपल्याला ऑफिसला नेलं असेल, घरी सोडलं असेल हे आठवून अंगावर शहारे येतील. ते शहारे गर्दीत थोड्याच वेळात विरून जातील. रेल्वेची बेपर्वाई, ठाणे महानगरपालिकेची बेपर्वाई आम्ही विसरून जाऊ...




निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.


4 comments:

  1. अमीत... मस्त! कुठल्याही अपघातानंतर होतं तेच पुन्हा झाल्याचा अनुभव मुंबईकरांना आला. स्टेशनवर गर्दी... गाडीत गर्दी... गाड्या जागच्या जागी उभ्या... ऑफीसमध्ये अडकून पडणं... अगदी सगळं जैसे थे! तू मोटरमन रामचंद्र यांचा मृत्यू आणि त्या घटनेचं मुंबईकरांशी असलेलं नातं अतिशय छान टीपलंयस. खरंच... रामचंद्र यांनी आपल्याला किती वेळा नेलं-आणलं असेल? आपल्याला माहित नाही... आपल्या एखाद्या तरी छोट्याशा प्रवासाचं सारथ्य त्यांनी केलं असेल... नसेल... पण आपण तमाम मुंबईकरांच्या वतीनं रामचंद्र यांना श्रद्धांजली वाहिलीच पाहिजे...

    ReplyDelete
  2. अमित फारच छान लेख झाला आहे. फक्त पाहत बसण्यापेक्षा अधिक काही आपल्या हातात नसतं. त्यामुळं हताशपणे पाहत बसणं किंवा कोणाच्या तरी नावानं बोटं मोडत बसण्यापेक्षा आपण काहीच करु शकत नाही. आणि तसंही पुढच्या वर्षी याच तारखेला रामचंद्रन यांचं नावही कोणाच्या लक्षात नसेल. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये साळस्कर यांचं नाव राहत नाही. साळस्करांची ही अवस्था तर इतरांचं काय... पब्लिक मेमरी इज शॉर्ट हेच खरं...

    ReplyDelete
  3. अमित भिडेश...
    सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल.. आणि मग ती हळहळ पुन्हा एकदा गर्दीत घुसमटून जाईल..हेच सत्य आहे आणि तेच सगळ्यात वाईट आहे.
    लेख खरंच चांगला झालाय. घटना खुपच वाईट झालीय. गॅसकटरच्या ठिणग्या अंगावर झेलत रामचंद्रन यांनी आपलंच मरण आपल्या डोळ्यांनी झेलावं, यासारखं दुसरं दुर्दैव ते काय..पण भिडेश राजकारण्यांकडून भलत्याच अपेक्षा ठेवता तुम्ही. मी तर म्हणतो राजकारण्यांच्या तावडीत ते सापडले तर उसना पुळका आणून हेच राजकारणी त्यांचं खेळणं बनवतील. मुंबईकरानं आपलं मुंबईकरासारखं रहावं. दिलखुलास.. एकमेकांना मदतीचा, आपुलकीचा अन माणुसकीचा हात देत जगावं. अगदी लोकलमध्ये धावत येणाऱ्याला मदतीचा हात पुढे करावा अगदी तसंच..रामचंद्रन यांना आपण आपल्याच एका कप्प्यात सांभाळून टेवावं. अगदी जपून. तिथेच ते सुखरूप राहतील...

    ReplyDelete
  4. अमित प्रथम तुझे धन्यवाद लेख खूप चांगला लिहला आहे...

    आपण सारे काही झालं की राजकारण्यांनवर येवून कोसळतो. पण जरा आपण हा विचार केला तर त्यांना निवडून देणारे कोण..मुंबईच्या लोकल ट्रेनची दिवसें-दिवस हालत बेकार होत चाललीय या निवडणुकीत मुंबईतरी मुद्दा हवा होता. मात्र तसं झालं नाही. आपल्याकडे निवडणुकीचे मुद्देही वेगळेच आहे हे हास्यापद आहे. त्यामुळे फक्त राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही तर आपण स्वतः आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.

    ReplyDelete