Wednesday, June 15, 2011

एका नाईट शिफ्टचा प्रवास....

नाईट शिफ्ट तुम्ही अनेकदा केली असेल. नाईटसाठी घरातून निघताना प्रचंड कंटाळा आलेला असतो. निघताना कामावरून परतणारी मंडळी आपल्याला विचारतात, “ अरे वा नाईट वाटतं..” आपण त्यांना हो.. काय करणार असं म्हणून हसून उत्तर देतो.. स्टेशनवरही आपण प्रवाहाच्या विरूद्ध चालत आहोत याची जाणीव होते. आपली गाडी येते, आपण अगदी रिकाम्या गाडीत बसतो.. गाडी सुरू होते.. मजल दर मजल करत आपण ऑफीसमध्ये पोहोचतो. आणि गपगुमान कामाला लागतो.. असा एक सर्वसाधारणपणे आपला नाईटशिफ्टचा प्रवास होतो.

पण आज नाईटला जाताना मी अत्यंत सुंदर प्रवास अनुभवला.. अचानक, काहीही ध्यानीमनी नसताना अतिषय तृप्त प्रवास झाला.. नेहमीसारखा कंटाळलेल्या वातावरणात ठाण्यापर्यंत आलो. माझं ऑफीस सीबीडी बेलापूरला आहे त्यामुळे मला ठाण्याला गाडी बदलावी लागते. ठाण्याला पनवेल गाडीत बसलो. रात्रीची १०.५० ची पनवेल असल्यामुळे रिकामीच होती. सरळ विंडो मिळाली. त्यामुळे गाडी सुरू होईपर्यंत सुखावलो होतो. गाडी निघायला पाच मिनिटं होती. झोप आणायचा प्रयत्न केला पण झोप येत नव्हती. मग कानाला इयरफोन लावला आणि मोबाईलवर गाणी ऐकायला सुरूवात केली. सुरूवात झाली ती हरीहरन यांच्या गझलांनी.. पहिलीच गझल सुरू झाली ती गुलो में रंग भरे, खरं म्हणजे ही गझल मेहंदी हसन यांची.. ती हरीभाईंच्या आवाजात माझ्याकडे आहे.. गुलो में रंग भरे, बादे नौ बहार चले... वा.. क्या बात है..

गुलो में रंग भरे, बाद नौ बहार चले,
चले भी आओ, के गुलशन का कारोबार चले..

गझल ऐकताना अचानक डोळे मिटले गेले, गाडी सुरू झाली... सगळं विसरायला झालं.. गुलो में रंग भरे पाठोपाठ सुरू झाली हरीभाईंच्याच धीरगंभीर आवाजातली...
हवा का जोर भी काफी बहाना होता है..
अगर चराग किसी को जलाना होता है..

बाहेर हलकासा पाऊस सुरू झाला होता.. थंड तुषार चेहऱ्यावर उडत होते. डोळे उघडवत नव्हते. थंड वारा आणि पावसाचे तुषार चेहऱ्याला सुखावत होते. सुंदर सारंगी, कडक तबला आणि त्याला संतूर आणि बासरीची उत्तम साथ अशी हरीभाईंची जबरदस्त मैफल रंगली.

हमने इक शाम चरागो से सजा रखी है
शर्त लोगो ने हवाओ से लगा रखी है..

एकामागोमाग एक गझला सुरू झाल्या.. दिलनशीनमधली हमने काटी है तेरी याद मे राते अक्सर... त्यानंतर काश मधली झुम ले हस बोल दे प्यारी अगर है जिंदगी... त्यानंतर हाझीरमधली मरीज इश्क का जिया ना जिया..त्याला हरीभाईंना मिळालेली झाकीरभाईंची तुफान साथ... या दोघांनाही काही ठिकाणी वरचढ ठरणारी संतूरची साथ.. वेड लावून गेली. पावसाच्या तुषारांमुळे चेहरा संपूर्ण भिजला होता. पाणी उडतं म्हणून माझ्या बाजूचा माणूस वैतागला होता.. तो बहुदा नंतर कुठे तरी उतरून गेला.. पण मला अजिबात डोळे उघडवत नव्हते. काश ऐसा कोई मंजर होता, मेरे कांधेपे तेरा सर होता.. वा क्या बात है.. नेरूळ ते सीबीडी या टप्प्यात या गझलेने धुंद केलं. हरीभाई बेस्ट की त्यांना साथ करणारी सतार बेस्ट की इलेक्ट्रीक गिटारवर वाजलेलं फ्युजन नावाजावं असा प्रश्न पडला. काय सुंदर ताळमेळ.. सीबीडी स्टेशन आलं. काय करणार ऑफीसला जायचं असल्यामुळे उतरावं लागलं...

उसने उलझा दिया दुनिया में मुझे,
वरना एक और कलंदर होता..

सीबीडीला उतरल्यावर इतर काहीही बोलण्याची ऐकण्याची इच्छा राहीली नाही.. हेडफोन काढून शांतपणे ऑफीसकडे चालत निघालो.. चाळीस मिनिटांपूर्वी आलेला कंटाळा, शीण, थकवा संपला होता.. रामदेव, त्याचं आंदोलन, क्रिकेट मॅच, भाजप, काँग्रेस, मुंडे असली सगळी जळमटं उडून गेली होती..

Wednesday, March 16, 2011

सेवाव्रत

या मुंबई शहरात अनेक लोक अनेक कारणांनी येतात. प्रत्येकाची या मुंबापुरीकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा हे शहर पूर्ण करतंय. एक गोष्ट इथं स्पष्ट केली पाहीजे हे शहर याचा अर्थ इथला समाज.

मुंबईत कोणीही उपाशी रहात नाही, प्रत्येकाला काम मिळतंच. त्याची हातातोंडाची गाठ पडतेच असं अभिमानाने म्हटलं जातं. त्यामुळे या शहराला जॉब हब असंही म्हणतात. जॉब मिळाला की सगळंच मिळतं जातं.. मुंबई सर्वांची गरज पूर्ण करते. पण याच मुंबईची अजून एक ओळख आहे. अद्ययावत वैद्यकीय मदत देणारी ही नगरी.. मेडिकल हब असं म्हणा ना.. त्यातही कँसर, हार्ट अशा असाध्य आणि किचकट रोगांवर इलाज हे मुंबईचं वैशिष्ट्य. राज्यातून, देशातूनच नाही तर परदेशातूनही अनेक रूग्ण उपचारांसाठी मुंबईत येतात. केईएम, टाटा, वाडीया, जसलोक, कूपर, कँसर रिसर्च सोसायटी अशी अनेक हॉस्पिटल्स इथे उभी आहेत. रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर इलाज सुरू आहेत. या हॉस्पिटल्सचे खरोखर उपकार आहेत. पण तेवढचे उपकार आहेत इथल्या काही सामाजीक संस्थांचे..

अशाच एका संस्थेत काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. नाना पालकर रूग्ण सेवा समिती या संस्थेचं रूग्ण सेवा सदन परळला आहे. रूग्ण सेवा समितीद्वारे केलं जाणारं काम पाहीलं आणि थक्क व्हायला झालं. मुंबईत उपचारासाठी आल्यावर रूग्णांवर तर हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातात. पण या रूग्णांच्या नातेवाईकांचं काय. त्यांनी मुंबईत रहायचं कुठे. तर अशा रूग्णांसाठी आणि रूग्णांच्या नातेवाईकांसाठी रूग्ण सेवा सदन सारखी वास्तू उभी आहे. आज तब्बल दहा मजल्यांची ही वास्तू आहे. तब्बल ७६ रूग्ण, प्रत्येक रूग्णांचे दोन नातेवाईक अशा एकूण २२८ जणांच्या भोजन निवासाची सोय इथे होते. एका खोलीत दोन रूग्ण आणि त्यांचे दोन दोन सहकारी अशी व्यवस्था केली जाते. प्रत्येक खोलीत स्वच्छतागृह पंखे, सोलरद्वारे गरम पाणी, लॉकर अशी सुविधा दिली जाते. विशेष म्हणजे अतिषय नाममात्र दरात ही सोय केली जाते. इथे नाममात्र म्हणजे अक्षरशः नाममात्र असं म्हटलं पाहीजे. कारण त्यापेक्षाही कमी दरात सोय करायची असं म्हटलं तर म्हणजे फुकट असंच म्हटलं पाहीजे.. आणि तशी अक्षरशः फुकट सोयही इथे अतिषय गरीब आणि गरजूंचीही केली जाते हे नमुद केलंच पाहीजे.



नाना पालकर हे संघाचे एक विचारवंत कार्यकर्ते. वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांचं देहावसन झालं. एवढ्या कमी आयु्ष्यात नानांनी सेवाकार्य हेच आपलं जीवनध्येय आहे असं मानून संघकार्यासाठी जीवन समर्पित केलं. उत्तम लेखक, कवी, कार्यकर्ता, प्रभावी वक्ता, ल अशी स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली. रूग्णसेवेविषयी त्यांना आत्यंतिक निष्ठा आणि आस्था होती. १९६७ मध्ये नाना पालकर यांचं देहावसन झालं. त्यानंतर त्यांच्या सहयोगींनी १९६८ साली नाना पालकर स्मृती समितीची स्थापना केली.

या संस्थेने चालवलेले उपक्रम हे खरोखर गरीबांसाठी उपकारक ठरले आहेत. १० मजली रूग्ण सेवा सदनाची आपण ओळख वर करून घेतली आहेच. याशिवाय नाना पालकर चिकित्सालय, डॉ. ग. कृ. पाटणकर क्षय रोग चिकित्सा केंद्र, गोखले डायलेलिस केंद्र, तुलसियानी स्पेशालिटी लॅबोरेटरी, मधू औषध पेढी, प्रभाकर कुटूंब कल्याण केंद्र, रूग्णमित्र हे वैद्यकीय मासिक असे अनेक मोठे उपक्रम राबवले जातात. याशिवाय रायगड जिल्ह्यात कुपोषित आजारी मुले व माता पोषक आहार, नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा, धडगाव कुपोषण निर्मुलन, माटुंगा आणि औरंगाबाद इथे लिथोस्ट्रीप्सी केंद्र, टाटा हॉस्पिटलसमोरचं डॉ. शिवानंद लवेकर चिकित्सालय, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मोघालय इथे सेवा भारती आरोग्यसेवा असे अनेक उपक्रम आणि सहउपक्रम नाना पालकर स्मृती समितीतर्फे राबवले जातात.

डायलेसिस सेंटर, लिथोस्ट्रीप्सी सेंटर, किंवा पॅथोलॉजिकल लॅब चालवणे यात नवल ते काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाला उत्तर असं आहे की या सर्व ठिकाणी हे सर्व उपचार आणि तपासण्या अतिषय नाममात्र दरात आणि काही केसेसमध्ये फुकटसुद्धा दिल्या जातात. आज मुंबईत डायलेसिसचे दर काय आहेत याची माहिती करून घ्या.. या संस्थेमध्ये डायलेसिस अवघ्या ३५० रूपयात केले जातात. विशेष म्हणजे २००४ पासून हे दर एक रूपयानेही वाढलेले नाहीत. सदनात १२ मशिन्स कार्यरत आहेत. रोज तीन पाळ्यांमध्ये एकूण ३६ रूग्णांना या सेवेचा लाभ मिळतो. याशिवाय तुलसियानी स्पेश्यालिटी लॅबोरेटरीमध्ये एड्स एचआयव्ही संबंधीत सी.डी.३, सी.डी. ४ तपासण्या अवघ्या २५० रूपयात केल्या जातात. याशिवाय बाकीच्या सर्व तपासण्या अत्यंत नाममात्र दरात केल्या जातात. मधु औषध पेढीमार्फत आर्थिक असहाय्यतेमुळे वैद्यकीय उपचार पूर्ण करू न शकणाऱ्या रूग्णांना औषधोपचार, आहार, फळे, इंजेक्शन्स, ऑपरेशन्स, जेवण, कपडे यांसाठी लागणारी मदत दिली जाते.


याशिवाय या संस्थेतर्फे मुंबईच्या विविध रूग्णालयात बालरूग्णांच्या मातांना पोळी भाजी, बाल रूग्णांसाठी नाश्ता, फळवाटप केलं जातं. वाडिया, जेजे, नायर, सायन, पॅराप्लेजीक सोसायटी केईएम, रिसर्च सोसायटी, शिवडी, हाजी बच्चुअली रूग्णायल, क्षयरोग रूग्णालय या हॉस्पिटल्सना आर्थिक मदत दिली जाते. या हॉस्पिटल्समध्ये रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना लागणारी आहार आणि औषध विषयक मदत दिली जाते.





या संस्थेचा मदतीचा आवाका पाहून थक्क व्हायला झालं. स्वतः नाना पालकरांसोबत काम केलेल्या ज्येष्ठांच्या हातात आज या संस्थेची धुरा आहे. श्री. छत्रे, श्री बोपर्डीकर, श्री. खरे, डॉ. अजित फडके यांच्या समर्थ हातात या संस्थेचं कार्य निस्पृहपणे सुरू आहे. यातल्या श्री. छत्रे आणि श्री. बोपर्डीकर यांच्याबरोबर ही संस्था पाहण्याचा योग आला. श्री. छत्रे स्वतः ८३ वर्षांचे आहेत. तर श्री. बोपर्डीकर ७५ वर्षांचे आहेत. पण या दोघांचा कामाचा आवाका, रूग्ण सेवेची कळकळ, आणि संस्थेवर असलेलं प्रेम पाहून 'तेथे कर माझे जुळती' अशी मनाची अवस्था होते.

काही व्यक्ती आणि संस्थांच्या चांगुलपणावर समाज टिकून आहे असं म्हणतात, त्यातली एक संस्था पहायचा योग आला एवढं नक्की..

Thursday, March 3, 2011

पोटासाठी वाटेल ते..

टीचभर खळगीसाठी माणसाला काय काय करावं लागतं याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मायानगरी मुंबईत नशिब काढायला आलेल्यांनी तर काय काय धंदे केलेत, काय काय पचवलंय याचे तर अगणित किस्से आहेत. त्यात आता आणखी एक किस्सा.. या फोटोतली ही मॉडेल आहे सोफिया हयात..

मुळची पाकिस्तानी मॉडेल. मुंबईत आपलं करियर घडवण्यासाठी ती आलीये. तशी ती ब्रिटीश नागरिक, पण जन्माने पाकिस्तानी. ही मॉ़डेल, टीव्ही एँकर, एँक्ट्रेस आता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. बॉलिवूडचा तुफान पैसा तिला खुणावतोय. पण 'इये बॉलिवूडचीये नगरी' बस्तान बसवायचं म्हणजे फार कठीण काम आहे. अनेकजणी आल्या आणि गेल्या. या बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अनेकांच्या रांगा लागल्यात. त्यांना स्ट्ररगलर्स असं गोंडस नाव देण्यात आलं. त्या स्ट्रगलर्सच्या यादीत आता सोफियाचंही नाव सामील झालंय. तर सांगायचा मुद्दा असा की आता सोफियाचा हा फोटो पहा.. या फोटोत ती भारताला प्रमोट करत आहे.

भारताला प्रमोट का.. तर आता तिचा पहिलावहिला भारतीय सिनेमा म्हणजेच बॉलिवूड चित्रपट येतोय. त्याचं नाव आहे 'डायरी ऑफ ए बटरफ्लाय'.. हा चित्रपट फारसा कोणी ऐकलेला नाही. पण सोफियाची बॉलीवूडमध्ये जम बसवण्याची इच्छा आहे. त्यासाठी ही पाकिस्तानी मुलगी भारताची झेंडा गालावर कोरून, स्वतःच्या उघड्या पाठीवर किंवा कंबरेवर भारताला शुभेच्छा गोंदवून, भारताला चिअर करत्ये..वा.. पोटासाठी काय काय करावं लागतं.. एक पाकिस्तानी मुलगी अशा भारताला शुभेच्छा देत आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्या कलाकारांना व्हीसा नामंजूर करतोय. राहत फतेह अली खानच्या प्रकरणानंतर पाकिस्ताननं भारतात जाणाऱ्या कलाकारांना नाहरकत प्रमाणपत्र घेण्याचं बंधन घातलंय.

पण एवढं सगळं झालं तरी सोफिया भारताला चिअर करत्ये. क्या बात है.. पोट काय काय करायला लावतं..

Monday, February 7, 2011

हम दोनो- रंगीन..

रविवार साजरा करायचा होता. तीन सिनेमे नजरेत होते. ये साली जिंदगी, दिल तो बच्चा है जी, किंवा भागमभाग.. यापैकी कोणत्या सिनेमावर पैसे फुकट घालवायचे याचा विचार सुरू होता. सकाळी सकाळी मोहम्मद रफींची सीडी लावली होती. माझ्याकडे रफिसाहेबांची जवळपास दोनशे अडीचशे गाणी आहेत. त्यापैकी 'अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही' हे तुफान आवडतं गाणं. ते गाणं ऐकताना नेहमी वाटायचं की मोठ्या स्क्रीनवर हे गाणं ऍकायला कसं वाटेल. त्याचवेळी आठवलं अरे आपण तीन दिवसापूर्वीच हम दोनोच्या रंगीत आवृत्तीची बातमी केलीय. लगेच निर्णय झाला.. वर उल्लेख केलेले तीनही चित्रपट बाद.. डोंबिवलीत पूजा टॉकीजला दुपारी साडेतीनचा हम दोनो रंगीन चा शो आहे.. तोच पहायचा.. बाबांना विचारलं पिक्चर चांगला आहे का.. बाबा म्हणाले त्यांनी कॉलेजमध्ये बंक करून तीन वेळा हा चित्रपट पाहीलाय. गाणी ऐकण्यासाठी आम्ही पिक्चर पहायचो.. क्या बात है ! अभी ना जाओ छोडकर, मै जिंदगी का साथ निभाता चला गया, अल्ला तेरो नाम.. अशी एकसे बढकर एक गाणी मोठ्या स्क्रीनवर ऐकण्याची इच्छा अनावर झाली.


आयत्यावेळी थिएटरवर पोचलो तरी तिकीटं मिळतील याची खात्री होती त्याप्रमाणे तिकीट मिळाली. पिक्चर पहायला अगदी थोडी माणसं आली होती. टिव्हीवर पन्नासवेळा लागलेला हा सिक्सटीजमधला सिनेमा पहायला कोणाला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे आलेले खरोखर दर्दी आले होते. माझे आई बाबा मी आणि बायको असे आम्ही एकच पूर्ण फॅमिलीवाले होतो. बाकी लोकांत बहुतेकांनी साठी ओलांडलेली होती. त्यातले सगळेजण देव आनंदला पुन्हा एकदा स्क्रीनवर पहायला आले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या चॉकलेट हिरोला पहाण्यासाठी लकाकी आली होती. एक आजी आजोबा हातात हात घालून आले होते. थिएटरमध्ये आत सोडल्यावर सिनेमा सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनीटात सर्व आजी आजोबात ओळखपाळख नसताना संवाद रंगला.. देव आनंद तेव्हा काय दिसायचा.. त्याच्याकडून अभिनयाची अपेक्षाच नव्हती.. तीन तास तू फक्त पडद्यावर दिस.. रफीसाहेबांचा आवाज.. देव आनंदला त्यांचाच आवाज कसा सूट व्हायचा..जयदेवने संगीत देताना काय कमाल केली.. असे अनेक विषय निघाले. प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह संचारला होता. आणि तेवढ्यात सुरू स्क्रीनवर सुरू झाला म्हाताऱ्या देव आनंदचा प्रेक्षकांशी साधलेला संवाद.. नमश्कार.. मै देव आनंद बोल रहा हू.. हम दोनो मेरी आखरी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म.. असं त्याने सांगायला सुरूवात केली. त्यानंतर मै जिंदगी का साथ निभाता चला गयाची लायटरची सुंदर धून सुरू झाली. आणि मग ते अलगत फेड आऊट होत स्क्रीनवर आलं सेन्सॉर सर्टीफिकेट.. त्यावर मुद्दाम लिहीलं होतं.. हम दोनो रंगीन... सिनेमास्कोप.. क्या बात है..


मी ही चित्रपट याआधी पाहिला नव्हता.. त्यामुळे मला सगळाच नवा होता.. पण तळ्याकाठी बसलेल्या रंगीत देवआनंदला पाहिल्यावर थिएटरमध्ये एक अलगद चित्कार ऐकायला आला.. पहिल्या जवळपास दोन अडीच सीनमध्ये एकही डॉयलॉग नाही.. फक्त देव आनंद, साधना आणि लायटरची धून.. त्यानंतर माझं तुफान आवडतं गाणं सुरू झालं. अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.. आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज मोठ्या स्क्रीनवर मी प्रथमच ऐकला होता. त्याआधी टायटल प्ले होताना सुद्धा.. स्क्रीनवर सिंगरच्या खाली मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले ही तीन नावं मी माझ्या आयुष्यात प्रथमच वाचली.. घरात बसून या सगळ्यांच्या सीडी ऐकणं आणि प्रत्यक्ष त्यांची नावं स्क्रीनवर पहाणं यात मोठा फरक आहे. तो अनुभव मला घ्यायचा होता. तो मिळाला.. अभी ना जाओ छोडकर ऐकताना खुप सुंदर वाटतं. थिएटरच्या साऊंड सिस्टीमवर हे गाणं फक्त रफीसाहेबांचा आवाज, अत्यंत सुंदर वाजणारा धा तीं तीं ताक धीं धीं वाजणारा तबला आणि हार्मोनियम, आणि इतर थोडकी वाद्य.. आणि संतूरची कमाल.. हा एक तुफान अनुभव होता. वाद्यांच्या आवाजात हरवून जाण्याच्या या काळात रफीसाहेबांचा गोड गंभीर आवाज ऐकण्यासाठी थिएटरचीच सिस्टीम हवी..

मला एक न उलगडलेलं कोडं आहे.. रफीसाहेबांनी देव आनंदला आवाज दिला, दिलीप कुमार, शम्मी कपूर आणि राज कपूर वगळता इतरांनाही दिला. पण प्रत्येक वेळी गाणं ऐकताना त्यांनी त्या त्या हिरोला सूट करेल अशाच आवाजात गाणं गायलय. हे कसं ते कळत नाही. देव आनंदला दिलेल्या आवाजाची ढब आणि शम्मी कपूरला दिलेल्या आवाजाची ढब वेगळी कशी.. ही काय जादू हा देवमाणूस करतो.. हैराण करणाऱ्या गोष्टी आहेत या.. हर फिक्र को धुए मै उडाता चला गया म्हणणाला कॅप्टन आनंद अप्रतिम..

पिक्चर संपला. बाहेर आलो.. तेव्हा काही बोलायचं नव्हतं. सिक्सटीजमध्ये लोकांना देव आनंदने का वेड लावलं. तू फक्त पडद्यावर तीन तास दीस.. अभिनयाची अपेक्षा नाही.. मोहम्मद रफी हे काय रसायन आहे. फक्त गाणी ऐकण्यासाठी आम्ही तीन वेळा हा चित्रपट पाहिला असं बाबा का म्हणाले. याचं रहस्य उलडगडलं. यही कहो गे तुम सदा के दिल अभी नही भरा.. असं खट्याळपणे म्हणणारी आशा भोसले की साधना.. एक जादू मनावर घेऊन बाहेर आलो.. अजून त्यातून बाहेर येता येत नाहीये..