गणपतीच्या आगमनाची तयारी घरात पूर्ण झालीय. उद्या सकाळी गणपती आणायचा... माझ्या स्वतःच्या गाडीतून मी यावर्षी गणपती आणणार आहे याचा आनंद आहेच. पण गेल्यावर्षीपासून मनात एक खंतही सतावतेय. माझा चांदीचा गणराय आता आमच्यात नाही. एका विशिष्ट कारणासाठी आम्ही काही वर्षापूर्वी एका विशिष्ट कारणासाठी चांदीच्या गणेशाची सुंदर मूर्ती आणली होती. त्यावर मी एक पोस्ट याआधी टाकलीही आहे..
बिल्डींगच्या गेटपासून आत गजर करत गणपती आणायचा. त्याची शास्त्रोक्त दीड दिवस पूजा करायची आणि नंतर पार्कींगमध्ये पाण्याची बादली भरून त्यात विसर्जन करायचं. पाणी झाडांना घालायचं अशा स्वरूपात ही मूर्ती आम्ही काही वर्षे पूजली. त्यावरून आमच्यावर टीकाही झाली. प्रश्नही विचारले गेले. पण त्या गणपतीवरची आणि त्यापेक्षाही ज्या कारणासाठी तो आणला त्या तत्वावरची आमची निष्ठा अजिबात ढळली नाही. माझ्या घरातल्या गणपतीने मी नैसर्गिक जलस्त्रोत खराब होऊ देणार नाही ही त्यामागची भावना होती. पण मूर्ती चोरणा-या त्या हातांना या कोणत्याही तत्वांची किंवा उदात्त हेतूची वगैरे पडलेली नसते. 800 ग्रॅम चांदी... बास पळवा... एवढा एकमेव हेतू मनात ठेऊन ते आमच्या बाप्पाला घेऊन गेले.
http://www.janeeva.blogspot.in/2009/08/blog-post_23.html
मात्र आता हा गणराय आमच्याकडे नाही. 20 मे 2014 या दिवशी आमच्या घरात घरफोडी झाली. त्यात हा गणराय चोरट्यांच्या हाती लागला. 800 ग्रॅमची ही मूर्ती चोरट्यांनी लांबवली. तेव्हापासून हा गणराय आमच्यापासून दूर गेलाय. कळत नाहीये काय करू. असंख्यवेळा पोलीस स्टेशनच्या खेपा घातल्या पण पोोलिसांनाही काही क्लू लागत नाहीये. पोलीस आता त्यात विशेष रसही घेत नाहीयेत. एका विशिष्ट कारणासाठी आमच्या घरात आलेला हा गणराय निघून गेलाय.

ठिक आहे, माझ्या मनात हे तत्व कायम आहे. ते त्या गणरायालाही माहिती आहे. आमच्या घरात राहून राहून त्याला कंटाळा आला असेल त्यामुळे सध्या तो फिरायला बाहेर गेला असेल. पण तो परत येईल हा माझा विश्वास आहे. आमच्या प्रत्येकाच्या मनात त्या मूर्तीचं रूपडं जिवंत आहे. त्याचा स्पर्ष माझ्या हाताला नेहमीच जाणवत असतं. आमचा हेतू प्रामाणिक होता. तो त्याला माहिती होता. त्या हेतूलाच पुन्हा मूर्त रूप देण्यासाठी आमचा चांदीचा गणराय पुन्हा येईल.
गणपती बाप्पा मोरया...
No comments:
Post a Comment