Sunday, December 6, 2009

मी अँकर बोलतोय

मित्रांनो ब्लॅक कॉमे़डी नावाचा विनोदाचा एक प्रकार आहे. नेटवर त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न केला. तर विकीपेडीया डॉट कॉम या वेबसाईवर पुढील अर्थ दिला आहे.

Black comedy
is a sub-genre of comedy and satire in which topics and events that are usually regarded as taboo are treated in a satirical or humorous manner while retaining their seriousness.

आता हा विषय काढायला एक कारण आहे ...

माझा एक जिवलग मित्र आहे अमोल जोशी. अमोल जोशी हा झी चोवीस तास या वृत्तवाहिनीवर निवेदक आहे. म्हणजे बातम्या सांगतो. त्याला तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल. मात्र बातम्या सांगणे एवढेच त्याला जमते असं नाही. तर तो सुंदर कविताही करतो. याआधी तो कवितांचे कार्यक्रमही करत असे. कामाच्या रगाड्यातून वेळ काढून त्याने एक सुंदर कविता केली आहे. ती कविता तुम्हा सर्वांना वाचता यावी यासाठी मी या ब्लॉगवर सादर करत आहे. अर्थात अमोलची त्यासाठी परवागनी घेतली आहे. कवितेत काय म्हटले आहे ते निव्वळ विनोद म्हणून वाचावे ही विनंती..
अमोल काय किंवा मी काय आमचा कोणाचाही हा प्रत्यक्ष अनुभव नाही हे आधीच स्पष्ट करतो.
( सिनियर्ससाठी!!!)... :)

जास्त काय बोलू कविता वाचा..



मी अँकर बोलतोय

ना मी मालक, ना संपादक
ना तारक, ना मारक मी
वेळेत येतो, वेळेत जातो
आज्ञाधारक अँकर मी.... //धृ//

चेह-यावरती थापुनी मेक-अप
वेळापत्रक करुनी चेक-अप
शिरतो मग मी स्टुडिओमध्ये
जंटलमनचा करूनी गेट-अप
अंगावरच्या कोटाआतील, भुलतो गंजीची भोके मी
हास्य आणतो ओठांवरी, कधी देतो भाव अनोखे मी
वेळेत येतो, वेळेत जातो......१

काय जाहले, जरी मी सध्या
घरात राही भाड्याच्या ?
खडसावूनी या जाब विचारी
अध्य़क्षाला म्हाडाच्या
स्टुडिओमध्ये गुरगुरतो, पण ऑफिसमध्ये शेळी मी
बाता करतो हापूसच्या अन्, घरात खातो केळी मी
वेळेत येतो, वेळेत जातो......

पटले वा, ना पटले तरीही
अंगावर घेतो व्हीआयपी
फिरून तरी माझीच मारती
इतुकाही ढळता टीआरपी
विकला गेलो तर मी श्रीफळ, ना विकता मग गोटा मी
प्रायोजक मिळता लेकुरवाळा, ना मिळता वांझोटा मी
वेळेत येतो, वेळेत जातो.......

माझ्यासाठी जरी ही भाकर, इतरा मदिरा फसफसली
बोल लावती तेच जयांची, चाखण्या जिव्हा आसुसली
आज्ञा येता विष ओकतो, होतो मिठ्ठाळ पेढा मी
बोलविता कोणी वेदही बोले, ज्ञानोबांचा रेडा मी
वेळेत येतो, वेळेत जातो,
आज्ञाधारक अँकर मी.........

अमोल जोशी.

(कविता या ब्लॉगवर सादर करायची परवानगी दिल्याबद्दल अमोल जोशी यांना धन्यवाद)

Thursday, November 12, 2009

प्रिय सचिन तेंडुलकर यांस
सप्रेम नमस्कार ..
आमच्या आयुष्यावर आपण जी एक गडद छाया निर्माण केली आहे त्याला या १५ नोव्हेंबर २००९ ला वीस वर्ष पुर्ण झाली आहेत. त्याबद्दल बोलण्यापेक्षा थेट आपल्यालाच लिहावं असं वाटलं.. म्हणून हा पत्रप्रपंच..
एक सांगू का.. लिहीताना ' तुम्हाला, तुमचे, आपण ' असे आदरार्थी उल्लेख करायचे आहेत. ते आमच्या मनात आहेत. पण लिहीताना फार कठीण जातंय. रोज बोलताना सचिन असा स्पष्ट एकेरी उल्लेख करतो. मॅच सुरू असताना कधीतरी ' तेंडल्या ' असं स्पष्टपणे म्हणतो. त्यामुळे या पत्रातही पुढे सचिन असा एकेरी उल्लेख करणार आहे. त्याबद्दल तुला राग येणार नाही अशी आशा आहे.
सचिन पत्राच्या सुरूवातीला म्हटलं की आमच्या आयुष्यावर तुझी गडद छाया पसरली आहे. मात्र ती छाया काळी नाही. कठोर उन्हाळ्यानंतर पावसाचं आगमन होतं. त्यावेळी ढगांची जी शितल छाया सृष्टीवर पसरते ना.. तशी ही छाया आहे. कारण तुला सांगू त्याशिवाय आम्ही जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही मित्रांनी एक प्रयोग केला, दिवसभरात एकदाही सचिन हे नाव घेतले नाही असे किती दिवस आले मोजायचं. महिनाभरात असा एकही दिवस आला नाही. इतका तुझा प्रभाव. सचिन माझे वडिल सांगतात, सुनील गावसकर निवृत्त झाले त्यावेळी त्यांना असं वाटलं आता का क्रिकेट पहायचं, सचिन नेमकी हीच माझीही भावना आहे. तुझ्या निवृत्तीनंतर आम्ही का क्रिकेट पहायचं..
सचिन, तुझी क्रिकेट कारकिर्द आणि माझी शालेय आणि महाविद्यालयीन कारकिर्द एकाच काळातली. मी आणि माझ्या अवतीभवती असणारी मुलं आम्हा सर्वांना तू एक शिस्त लावलीस. माझ्या कॉलेजमध्ये एक सर होते, त्यांनी एकदा आमची कानउघडणी केली होती. त्यावेळी त्या क्रिकेटवेड्या सरांनी तुझे उदाहरण दिले होते. तुझ्या खेळातली खासीयत म्हणजे तुझा बॅलंस, तुझी खेळाकडे बघण्याची दृष्टी, एकाग्र होण्याची तुझी शक्ती, आणि फार थोड्या लोकांना मिळते अशी शक्ती म्हणजे दूरदृष्टी.. या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यावेळी त्याआम्हाला कळल्या नाहीत. खरंच सांगतो. त्यावेळी आम्ही फक्त ' तेंडल्या असा खेळला. तेंडल्याने वॉर्नला असा धुतला ' यातच रमलो. पण तुझ्या खेळातून आम्ही काय शिकू शकलो असतो हे तेव्हा उमगलेच नाही. तुला सांगू तुझ्यात आणि उतर टिन एजर्समध्ये असलेला हा मोठा फरक. टीनएजमध्ये जे आम्ही शिकावं ते तू आत्मसात केलं होतंस. आम्हाला काय शिकायचं आहे हेच कळलं नव्हतं.. असो शेवटी तेंडुलकर एकमेवाद्वितीय का आहे.. याचं हे उत्तर आहे.
सचिन तुझ्या कारकिर्दीतले अनेक क्षण न विसरता येण्यासारखे.. एकोणीसाव्या वर्षी पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर तू केलेलं पराक्रमी शतक खतरनाक असं होतं. त्याआधी १९९० मध्ये इंग्लंडविरूद्ध ओल्ड ट्रॅफर्डवरचं पहिलं वहिलं शतकही न विसरता येण्यासारखं. १९९६-९७ हंगामातली केप टाऊनमधली खेळी लाजवाब. १९९९मध्ये पाकिस्तानविरूद्धची पाठदुखीने त्रस्त झाल्यावरही तुझ्या झुंजार १३६ धावा मी कधीच विसरू शकत नाही. कारण अवघ्या १२-१३ धावांनी हरल्यावर घरात मी रडलो होतो. ड्रेसिंगरूममध्ये तुझीही वेगळी अवस्था नव्हती अशी बातमी नंतर पेपरात वाचली होती. सचिन त्यानंतर इंग्लंडविरूद्ध पुन्हा एकदा चेन्नईतच तू शतकी खेळी केलीस आणि आपण तो सामना जिंकलो होतो.
सचिन पण आपण तुझ्या खेळी आठवताना शतकंच का आठवतो. दरबानमध्ये विश्वचषकात शोएब अख्तरला तू आणि सेहवागने दाखवलेली कयामत पाहून ऊर भरून आला होता. त्यावेळी तुला मिडऑफला रझाकने टाकल्यावर अक्रम भडकलेला पाहून खुप हसू आलं होतं. मात्र त्या सामन्यात तुझे शतक झाले नाही याची हळहळ वाटते. आणि म्हणून शोएबचा रागही येतो. शोएबवरून आठवलं. सचिन तुझी एक आठवण शोएबने सांगितली आहे ती आठवते. भारतात पाकिस्तानी संघ कसोटी मालिका खेळायला आला होता. त्यावेळी कोलकाता कसोटीच्या आदल्या दिवशी सरावाआधी पाकिस्तानी संघ एका अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या मुलांना भेटणार होता. त्या शाळेतल्या एका मूकबधीर मुलाला शोएबने विचारलं.. बेटा मै आपके लिये क्या करू ? त्यावर त्यामुलाने त्याला एका कागदावर उत्तर लिहून दिलं होतं. सिर्फ सचिनको आऊट मत करना...
सचिन मला काही प्रश्न तुला विचारावेसे वाटतात. तुझ्या पदार्पणाच्या कसोटीत तुला वकारचा चेंडू तोंडावर लागला होता. रक्ताने तुझे तोंड माखले होते. तू फक्त सोळा वर्षांचा होतास. त्यावेळी तू घाबरला नाहीस.. ही शक्ती तुझ्याकडे कुठून आली. सचिन नवज्योत सिंग सिद्धू ती आठवण एकदा टिव्हीवर सांगत होता. त्यावेळी त्याने जोरात अली इराणीला हाक मारली.. रक्त पाहिल्यावर तो पॅनिक झाला होता. मात्र त्यावेळी तू एकच शब्द उच्चारलास... मै खेलेगा !
सचिन दुसरं म्हणजे पाठदुखीने तू त्रस्त असतानाही १३६ धावा करणं किंवा अनेकवेळा भारताची जबाबदारी एकट्य़ाने उचलणं हे धाडस करताना तू स्वतःचा विचार कधीच का केला नाहीस....
सचिन सर डोनल्ड ब्रॅडमन यांनी तुला भेटीसाठी बोलावले त्यावेळी तूझा मनात कोणत्या भावना उचंबळून आल्या होत्या.
सचिन हेन्री ओलोंगाला तू तिरंगी मालिकेत धुतला होतास आठवते का.. ते तू खुन्नस खाऊन मारले होतेस की नाही...
सचिन तूझे २५ वे एकदिवसीय शतक आटवतं का.. त्यावेळी तू केलेला सर्वाधिक कंटाळवाणा खेळ (मला माफ कर) ... आदल्या सामन्यात रनआऊट झाल्याचा तो राग होता का...
सचिन, भारताचे सामने जेव्हा फिक्स होत होते. तेव्हा आजूबाजूला घडणाऱ्या या भयानक गोष्टीत तू तूझे चित्त स्थिर कसं ठेवलंस. सचिन आहे तोवर फिक्सर्सचे घाणेरडे डाव कधीच यशस्वी होणार नाहीत असा विश्वास तू आमच्या मनात निर्माण केला होतास.. एखादा मोठा भाऊ असतो ना.. त्याच्याविषयी जो विश्वास मनात असतो ना तो हा विश्वास....
सचिन एवढ्यावेळा तू मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आहेस तूला आता त्यात काही नाविन्य वाटतं का..
सचिन ज्यावेळी तुझ्यावर टिकेचे पहाड कोसळतात, ज्यावेळी आम्ही तुझ्यावर सर्व भार टाकून मोकळे होतो... त्यावेळी तुला कधी आमचा राग येतो का..
सचिन तुझ्यावर आम्ही अपेक्षांचे ओझे टाकतो... हो.. प्रत्येक सामन्यात तू शतक झळकवावेस असं आम्हाला वाटते. कोट्यावधी डोळे तुझ्या प्रत्येक कृतीकडे लागलेले असतात. तू काय करतोस, कसा खेळतोस याविषयी आम्ही प्रत्येकाने बोलण्याचा अधिकार घेतला आहे. हजारो होर्डींग्जवर आम्ही तुला पाहतो. आम्ही सगळे तूला ओळखतो.. तू आम्हाला ओळखत नाहीस. तरीही तू आमच्या अपेक्षा ओळखतोस आणि त्या पेलतोस.. म्हणून तू महान ठरतोस.
लोकांना सौंदर्यात काय पहायला आवडतं माहीत आहे ? सिमिट्री.. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असलेली प्रमाणबद्धता... सचिन मैदानातल्या तुझ्या हालचाली, तुझे वागणे, तुझे शॉट सिलेक्शन, तुझी खेळण्याची लकब, प्रतीपक्षाकडे पाहण्याची तुझी नजर, त्यांचे डावपेच ओळखण्याची तुझी धूर्तता, आणि प्रतीपक्षाला संपवण्याचा तुझा बेधडकपणा या सगळ्याच गोष्टीत एक प्रमाणबद्धता आहे. सचिन म्हणून सौंदर्यशास्त्रानुसारही तू मिस्टर परफेक्टच ( सॉरी राहुल..)
सचिन भारताची तू शान आहेस. तू भारतरत्न आहेस.. तू एक चांगला कर्णधार होऊ शकत नाहीस अशी टिका तुझ्यावर करतात. पण सचिन मला त्यांना असं उत्तर द्यावसं वाटतं की सचिन संघाला रूढार्थाने नेतृत्व देत नाहीस. पण तू उदाहरणांनी, स्वतःच्या कृतीतून नेतृत्व देतोस.. तू कर्णधार नाहीस तू त्यापेक्षाही पुढे आहेस.. एक आदर्श..
सचिन नुकतीच तू दोन एकदिवसीय शतके झळकावलीस.. त्यातली ऑस्ट्रेलियाविरूद्धची १७५ धावांची खेळी अजरामर. सचिन त्यावेळी तू पुन्हा एकदा तरूण झाल्यासारखा वाटलास. पुन्हा एकदा १९९८ मधला सचिन, शेनवॉर्नला डाऊन द ट्रॅक येत हाणणारा सचिन, कॅस्प्रोवीचला समोरच्या साईट स्क्रीनवर हवाईमार्गान दणकावणारा सचिन, थर्डमॅनला शोएबला भिरकावून देणारा सचिन, नजाकतदार पॅडलस्वीप सारखा भन्नाट शॉट इंप्रोवाईज करणारा सचिन, १९९४मध्ये सांगून चामिंडा वासला खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हज् मारणारा सचिन, तो सचिन पुन्हा एकदा अवतरल्यासारखं वाटलं.
सचिन एक क्रीडा पत्रकार म्हणून तुला मी अनेकवेळा पाहिला आहे. मी क्रीडापत्रकारीता क्षेत्रात पाऊल टाकेपर्यंत तू आमच्यापासून खुप लांब गेला होतास. तुझाशी बोलणं म्हणजे चंद्रावर जाऊन येण्यासारखं आहे. मात्र तरीही प्रत्यक्ष बोललो नसलो तरीही प्रत्येकवेळी तू अगदी माझ्यासारख्या युवा पत्रकाराचीही दखल घेतोस. तुझ्या नजरेत मी कधीही हा कोण हा भाव पाहिला नाही.. प्रत्येकवेळी तू सगळ्यांची दखल घेतोस, कधी बोलून कधी नजरेनं.. सचिन आजच्या युवा क्रिकेटपटूंमध्ये मला हे कधीही दिसत नाही.. तू शिखरावर आहेस पण तू आमच्याकडेही लक्ष देतोस..
सचिन हे पत्र संपवताना मला एक ओळ लिहावीशी वाटते.. ही ओळ माझी नाही... तुझ्या एका फॅनने तुझ्याविषयी हे लिहीले होते... इयन बॉथम हा क्रिकेटचा एरोल फ्लिन असेल, विव्ह रिचर्डस् क्रिकेटचा मार्टीन ल्यूथर किंग असेल, शेन वॉर्न क्रिकेटचा मर्लिन मन्रो असेल, मुथय्या मुरलीधरन क्रिकेटचा हॉबीट असेल.. तर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधला एक धर्मनिरपेक्ष संत आहे.. तू संत आहेस, खरोखर क्रिकेट हा धर्म असलेल्या भारत देशात तू एक संत आहेस...
तुझी कारकिर्द अशीच बहरत जावे आणि तुझ्या छायेतून आम्हाला बाहेर पडायची संधीही कधीही न मिळो अशी आमची तुला शुभेच्छा...
तुझा चाहता
अमित सुभाष भिडे

Saturday, October 24, 2009

आम्हीच का ???



निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.


हे सर्व सुरू असतानाच.. निकालांच्या दुसऱ्याचं दिवशी ठाण्यात एवढा मोठा गर्डर गाडीवर कोसळला, ठार झाले १२ जखमी झाले. मुंबईची जीवनवाहिनी जवळपास दिवसभर बंद झाली...


काय झालं... नाक चेपलेल्या गाडीपुढे अनेक बघे जमले.. आम्ही मिडीयावाले कॅमेरा घेऊन धावलो... गाडीसमोर उभे राहून बडबड केली... आमच्या चॅनलसमोर असंख्य बघे बसले.. त्यातच काही नवनिर्वाचित माननीय आमदार त्या गर्दीत आले. त्यांनी बाईट्स दिले... रेल्वेकडे आम्ही मेगाब्लॉक मागितला तो त्यांनी दिला नाही अशी रेल्वेवर आगपाखड झाली. रेल्वेनेही हात झटकले... कंत्राटदारावर कारवाई करून प्रकरण दाबायचा प्रयत्न सुरू झाला..


आर रामचंद्रन नावाचा एक मोटरमन होता तो गेला. एक प्रवासीही गेला, १२ जखमी झाले. पेपरवाल्यांनी त्यांची नावं छापली.. हे लोकही या जगात होते आहेत याचा एकमेव छापिल पुरावा राहीला. रेल्वेने मदत जाहीर केली. आणि झालं. अजून एक केस बंद झाली. गाड्या सुरू होतील ठाणे स्टेशन सोडल्यावर मुलुंडकडे जाताना अनेकवेळा त्या स्पॉटवरून जातील, सर्वसामान्य मुंबईकर काहीदिवस हळहळेल.. आणि मग ती हळहळ पुन्हा एकदा गर्दीत घुसमटून जाईल..


ठाण्यासारख्या अवाढव्य स्टेशनावर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा तय़ार नव्हती.. रेस्क्यू व्हॅन यायला दीड तास लागला... ठाणे फायरब्रिगेडकडे गॅसकटन नव्हता.. तो जवळच्या वेल्डींगवाल्याकडून आणावा लागला. आत माणूस अडकला आहे हे दिसत असतानाही आम्ही गॅसकटर वापरला.. अजून इतर कुठलाही कटर आमच्या कडे नव्हता.. ठिणग्या आतल्या माणसावर पडल्या.. तो मरता मरता अनेक चटके खाऊन गेला. तो मरायच्या आधी त्याचा हातही कोपरापासून काढावा लागला.. तो गेला.. गर्डर पडतोय हे लक्षात आल्यावर त्याने इमर्जन्सी ब्रेकही दाबला होता. गर्डर त्याच्या केबिनवर पडला. त्याच्या प्रसंगावधानामुळे तो मागच्या डब्यावर आला नाही... सर्वसामान्य मुंबईकर पुन्हा पुन्हा हे आठवणार.. तो आपल्या गाडीचा कितीवेळा मोटरमन असेल, त्याने कित्येकवेळा आपल्याला ऑफिसला नेलं असेल, घरी सोडलं असेल हे आठवून अंगावर शहारे येतील. ते शहारे गर्दीत थोड्याच वेळात विरून जातील. रेल्वेची बेपर्वाई, ठाणे महानगरपालिकेची बेपर्वाई आम्ही विसरून जाऊ...




निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.


Sunday, October 18, 2009

माती मधुनी दरवळणारे हे गाव माझे.....










तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा..



यावेळी मला माझ्या गावावर लिहावेसे वाटत आहे. गाव...! खरं म्हणजे डोंबिवलीला गाव म्हणणं मला स्वतःला जड जातयं. पण मुंबईत राहुनही आपल्या गावाविषयी लोकांत जो हळवेपणा आढळतो, तोच हळवेपणा आम्हा डोंबिवलीकरांना डोंबिवलीत राहुनही आढळतो.. मुंबईची सांस्कृतीक राजधानी असं बिरूद डोंबिवली अभिमानानं मिरवते.. प्रत्येक सण साजरा करण्याचा आमचा अंदाजच वेगळा.. डोंबिवलीत फडके रोडवर दिवाळी साजरी होते तशी कुठेच होत नसेल. ( हो ! खरं म्हणजे या प्रकाराची कॉपी ठाणेकरांनी आणि तत्सम इतर शहरांनी सुरू केली आहे. पण आमच्या दिवाळीची शानच न्यारी..) तशीच आमची विशेष गुढीपाडवा स्वागतयात्राही.. तर सध्या विषय चाललाय दिवाळीचा..
सर्वसामन्यातः दिवाळी कशी साजरी करायची, फटाके आणायचे की नाही, आणले तर किती.. किल्ला करायचा की नाही, कोणता करायचा.. कपडे कोणते घ्यायचे असले प्रश्न इतर मुलांना पडत असतील. डोंबिवलीकरांना दिवाळीचे प्रश्न वेगळे पडतात. फडके रोडवर पहाटे किती वाजता जायचं.. कोणता पेहराव यावेळी करायचा.. कोण कोण येणार आहे. कुठे भेटायचं, मित्रमंडळींना पहाटे कोण कसं किती वाजता उठवणार.. बाईक न्यायची की नाही.. नेली तर कुठे ठेवायची.. देवळात जाऊया, कीाहेरचा कार्यक्रम बघुया, की गर्दीत नुसते फिरूया.. मग घरी फराळ करायचा की मॉडर्न कॅफेत कॉफी पिऊया.... हे प्रश्न सच्चा डोंबिवलीकराला पडतात. फडके रोडची बातचं न्यारी.. फडके रोड हे नाव या रस्त्याला कोणी दिले. हे फडके कोण हे बहुतांश जणांना माहितही नसणार हे नक्की..पण फडके रोड आणि आमचं एक भावनीक नातं आहे.. गुढीपाडवा, दिवाळी, दसरा .. असा कोणताही मराठी सण असो किंवा फ्रेंडशिप डे असो, व्हॅलेंटाईन डे असो, डोंबिवलीकर तरूण फडकेवर एकत्र येतात.
एकतर फडके रोडच्या एका टोकाला असलेलं गणेश मंदिर संस्थान आणि गणपती डोंबिवलीकरांचा जीव की प्राण.. आणि डोंबिवली गणेश मंदिर संस्थानालाही डोंबिवलीतल्या युवापिढीचं वावडं नाही.. विविध निमित्तानं तरूण आपण होऊन या रस्त्यावर एकत्र येतायत हे जाणून संस्थानाने तरूणांसाठी विविध उपक्रम आयोजीत केले. त्यातलाच एक दिवाळीचा युवा शक्ती, युवा भक्ती दिन..
फडके रोडवर फिरणे म्हणजे मुली पहायला जाणे अशी डोंबिवलीबाहेरच्या लोकांची धारणा आहे. ती १०० टक्के खरी नाही. सध्या आपल्या आयुष्यात सोशल नेटवर्कींग साईटचे जे महत्त्व आहे तेच फडके रोडचे.. सोशल नेटवर्कींग साईट्स सुरू होण्या अगोदरपासून डोंबिवलीकर फडकेरोडवर फिरतायत. (मग फिरता फिरता काही पाहण्यासारखे चेहरे दिसले तर का पहायचे नाहीत!!!!)
शाळा सोडून तुम्हाला कितीही वर्ष झालेली असोत.. कॉलेजमधल्या मित्रांना तुम्हाला नेहमी भेटताही येत नसेल.. मात्र दिवाळीच्या दिवशी फडकेवर अगदी अनपेक्षितरीत्या कोणीही तुम्हाला भेटणारच भेटणार... यावर्षी साकेत लिमये या माझ्या एका मित्राने डोंबिवली सोडली आणि तो सि़डनीत राहायला गेला.. आम्हाला वाटलं तो आता कायमचा गेला. मात्र हा पठ्ठया सकाळी फडकेरोडवर दिसलाच... हा इसम दिवाळी फडकेवर साजरी व्हावी यासाठी सुट्टी काढून घरी आला आणि त्याने फडके मिस केलं नाही....
या वर्षी दिवाळीच्या पहाटे फडकेरोडवर तरूणाईची अशीच झुंबड उडाली होती. मात्र यावेळी गर्दी विभागली जावी यासाठी संस्कार भारतीतर्फे रांगोळीचा भलामोठा दुभाजक रस्त्याच्या मधोमध आखला जात होता. आणि खरं सांगतो.. रांगोळीवरून चालत जाण्याचा नतद्रष्टपणा एकानेही केला नाही.. अगदी प्रत्येकजण रांगोळीला आपला पाय लागणार नाही याची कसोशीने काळजी घेत होता.
अतिषय सुंदर झब्बा सलवार घालून त्यावर दुपट्टा मिरवत तरूण चालले होते. काहीजण चक्क धोतर नेसून आले होते. मुलींनी सुंदर साड्या नेसल्या होत्या... साडीवरून एक सांगतो.. या साड्यांमध्ये या मुली इतक्या आकर्षक दिसतात... मात्र एकदा दिवाळीच्या दिवशी पाहिलेल्या मुली नंतर परत डोंबिवलीत कुठे लुप्त होतात कोणास ठाऊन.. मी नंतर परत कधीही त्यांना पाहिलेले नाही.. त्यादिवशी त्या जशा दिसतात तशा परत कधीच दिसत नाहीत!!!!
लग्नाआधीची शेवटची दिवाळी असल्यामुळे यावर्षी फडके रोडवर जायचंच असं मी ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही मित्र सकाळी जमलोही.. मी का आलो हे मी बोलूनही दाखवलं. तेवढ्यात एक शाळेतला जुना मित्र गर्दीत भेटला. त्याच्याबरोबर त्याची नविनच लग्न झालेली बायकोही... त्याला म्हटलं अजून फडकेवरच ? तो म्हणाला जिथे जमलं ते ठिकाण कसं विसरू.. तेव्हा एक गोष्ट नक्की केली. आपलं फडकेवर जमलं नसलं तरी काय झालं. फडके रोड सगळ्यांना सामावून घेतो. त्यामुळे घरी जाता जाता मनात एक गोष्ट निश्चित झाली. लग्नाआधीची ही शेवटची दिवाळी असली तरी फडकेवरची शेवटची नाही!!!

Monday, September 14, 2009

एकमेवाद्वितीय...

तरूण असणं ही फक्त वयाशी संबंधित गोष्ट आहे, असं अजिबात नाही.. तारूण्य ही वयावर नाही तर मनावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. शारीरिक वय कितीही झालं तरी मनानं नेहमीच तरूण असणारी काही माणसं या भूतलावर अवतरली त्यातला एक म्हणजे सचिन तेंडुलकर... तिरंगी एकदिवसीय मालिकेतल्या श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात सचिननं आपलं ४४ वं शतक पूर्ण केलं. त्यानिमित्ताने साम मराठीच्या आमच्या बातम्यांसाठी एक पॅकेज लिहीले होते ते मला येथे पोस्ट म्हणून टाकावेसे वाटले..

त्याचं शारीरिक वय आहे ३६ वर्ष १४४ दिवस. त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला १८ डिसेंबर १९८९ या दिवशी म्हणजे बरोबर ४ दिवसांनी त्याच्या कारकिर्दीला २० वर्ष पूर्ण होतील.. तब्बल ४२७ एकदिवसीय सामने त्याने खेळले आहेत. तरिही धावांची भूक कायम आहे... नव्हे आता दुप्पट वाढलीय. आजही सर्वोत्तम सलामीवीर तोच आहे हे त्यानं दाखवून दिलंय. सलामीला आल्यावर ६ धावांची धावगती तो सहज राखू शकतो.. आणि आपलं शतक पूर्ण करताना आजही तो अवघे ९३ चेंडू घेऊ शकतो. शतक पूर्ण करताना त्याने अवघे ८ चौकार मारले.. याचा अर्थ त्याने ६८ धावा या पळून काढल्या .. श्रीलंकेतल्या सध्याच्या उकाड्यात या ६८ धावा पळून काढणं किती कठीण आहे हे सांगायला नकोच. आणि एवढ्या धावा पळून काढूनही तो अवघ्या ९३ चेंडूत शतक झळकावू शकतो.. शतक झाल्यावरही तो आडवीतीडवी बॅट फिरवून विकेट पणाला लावत धावांच्या मागे लागत नाही. टिकून राहत धावांचा वेग मंदावणार नाही याची काळजी मात्र नक्की घेतो.. धावा काढतानाचा त्याचा उत्साह आजही तरूण क्रिकेटपटूंना लाजवतो.. त्याचं चौकार मारतानाचं पदलालित्य आजही प्रत्येक विद्यार्थ्यानं पाहावं असं.. त्याची फलंदाजी हा धावांचा ओघवता धबधबा आहेच, पण तो एक संदर्भ ग्रंथही आहे. क्रिकेट शिकणाऱ्या प्रत्येकानं क्रिकेट कसं खेळायचं यापेक्षा क्रिकेट का खेळायचं याचा परिपाठ देणारी त्याची फलंदाजी... मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात तो आजही त्याचे सहजसुंदर फटके मारतो. ड्राईव्हज्, कट्स, पुल, हुक यांचा सुंदर मिलाफ तो घडवतो. ऑफसाईडला त्याला सापळ्यात पकडण्यासाठी पाच पाच क्षेत्ररक्षकांचं कडं उभारलं तरीही तो ते लिलया भेदून दाखवतो... सापळ्याच्या विरूद्ध दिशेला खेळून समोरच्या कर्णधारालाच सापळ्यात पकडण्याचं त्याचं चातुर्य तर लाजवाब. आपल्या खेळीनं संघाच्या धावा वाढवायच्या, संघाची जबाबदारी वाहायची, आपल्या चाहत्यांना खूष करायचंच त्याचबरोबर आपल्य़ा टीकाकारांनाही शांत ठेवायचं.. एवढी सगळी व्यवधानं गेली २० वर्षं अव्याहतपणे वाहणारा सचिन खरोखर एकमेवाद्वितीय...

( हा ब्लॉग प्रदर्शित करण्यासाठी साम मराठी वृत्तविभागाची मदत झाली. त्याबद्दल त्यांचे आभार)

Thursday, September 10, 2009

माय...

मधूरा नावाचा एक मुलाखतीचा कार्यक्रम साम मराठीवर प्रसारीत केला जातो. हा कार्यक्रम मी स्वतः एकदाही पाहीला नव्हता.. मात्र या बुधवारी म्हणजे ९ ऑक्टोबरला दुपारी सहज तीन वाजता हा कार्यक्रम पाहीला आणि एका शक्तीचा अनुभव घेतला. या कार्यक्रमात सिंधूताई सपकाळ यांची मुलाखत झाली. अनाथांची माय झालेल्या सिंधूताईंच्य़ा जीवनाची त्यांनी त्या एक तासात झलक दाखवली. त्यांचा प्रत्येक शब्द अक्षरशः महाकाव्य होता. आयुष्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी वगैरे मला मिळाली की नाही माहित नाही. पण काहीतरी मिळालं हे नक्की. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी सासूने लहानग्या मुलीसकट सिंधूताईंना घराबाहेर काढलं. पोटच्या तान्ह्या मुलीला घेऊन वणवण भटकणे नशीबी आले यापेक्षा कोणते मोठे संकट येऊ शकते.. एकट्या पडलेल्या स्त्रीसाठी ही परिस्थिती किती भयानक असेल हा फक्त विचारच शहारे आणतो. रेल्वेमध्ये भीक मागणं. जिवंत माणसं स्मशानात यायला घाबरतात म्हणून स्मशानात रात्री काढणं.. जळणाऱ्या प्रेताला विसावा म्हणून थोडे पिठ घातले जाते. त्याची भाकरी त्याच निखाऱ्यांवर भाजून पोटाची आग विझवण्याची पाळी या माऊलीवर आली. आपली पोटची पोर दगडूशेठ हलवाई प्रतिष्ठानच्या पायरीवर सोडून जाताना त्यांना काय यातना झाल्या असतील. त्यातून त्यांनी अनाथांची माय होण्याचा निश्चय केला. आपल्या मुलीला दूर ठेवणाऱ्या या मायनं चिखलदरा येथे जवळपास 175 मुली, माळेगाव ठेका (जि. वर्धा) येथे 25 वयोवृद्ध व परितक्‍त्या, कुंभारवळण ता. पुरंदर) येथे ममता बालसदनात 80 मुले, गुहा (जि. नगर) येथे 90 मुले व पुण्यातील हडपसर भागात 52 मुले-मुली, अशा 422 अनाथ मुला-मुलींचा व निराधारांचा सांभाळ केलाय. ज्याला कोणीच नाही, अशा मुलाला त्या सपकाळ व मुलगी असेल, तर साठे हे आडनाव त्या देतात. सिंधूताई 39 सुनांच्या व 182 जावयांच्या सासू झाल्या आहेत. हे पाहिल्यावर उर दडपतो. शुन्यातून विश्व उभे करणाऱ्यात आपण नेहमी प्रतिष्ठीतांची नावं घेतो. पण शुन्यातून खरोखर विश्व उभं करणं म्हणजे काय याची जाणीव या मायकडे पाहिल्यावर होते. सिंधूताईंनी म्हटलंय की स्त्री कधीही आत्महत्या करत नाही, ती तग धरते. त्या उदाहरण देतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र त्यांच्या पत्नी त्यांच्यामागे त्यांच्या घराचा आधार झाल्यात. स्त्री कोणालाही वाऱ्यावर टाकू शकत नाही कारण तीच्यात लपलेली असते एक माय.. या मायची जाणीव करून दिली सिंधूताई सकपाळ या मायनं.

Friday, August 28, 2009

गौरी झाली दुर्गा...

सकाळी सातच्या बातम्या वाचत होतो. साधारणतः अँकर वाचून झाला की स्टोरी प्ले होते. अशावेळी अँकरचे स्टोरीकडे लक्ष्य असतेच असं नाही. मात्र एका स्टोरीने आवर्जुन लक्ष वेधून घेतले. गौरी भोजनाच्या दिवशी हातकणंगले तालुक्यातल्या भादोले गावातल्या महिलांनी दारूबंदी आंदोलन यशस्वी केले. दारूबंदी आणि त्यासंबंधातल्या बातम्या सतत येतच असतात. त्यात महिलांनी उग्र रूप धारण करून गाव दारूमुक्त केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मात्र या स्टोरीत काहीतरी वेगळं होतं.
या आंदोलनाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. हातकणंगले तालुक्यातले वारणा नदीच्या काठावरचे भादोले गाव. ऊस उत्पादनामुळे सधन आणि संपन्न गाव. या गावात शिरकाव केलेल्या परमिट रूम आणि दारूच्या गुत्त्यांना हद्दपार करण्याचा विडा या गावातल्या महिलांनी उचलला. त्यासाठी दारूबंदी कृती समितीचीही स्थापना केली. त्यासाठी मतदान घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार झाला. गावातल्या एकूण तीन हजार सातशे ब्याण्णव मतांपैकी अठराशे सत्ताण्णव मतांची गरज होती. महिलांनी मतदानात सहभाग घेतला आणि बहुमत मिळवत दारूबंदीचा लढा जिंकला....
एवढी साधी सोपी सरळ वाटणारी ही या लढ्याची गोष्ट... मात्र वाटते तेवढी साधी सोपी सरळ गोष्ट नाही.. मतदान घेऊ शांततेच्या मार्गानं आदोलन जिंकण्याचा निर्धार केलेल्या ग्राम भगिनींसमोर वेगळेच आव्हान होते. दारूबंदी व्हावी, गावातून दारू हद्दपार व्हावी ही सगळ्यांचीच इच्छा होती का हा खरा प्रश्न आहे. मतदानासाठी जो दिवस निवडला गेला तो होता गौरी भोजनाचा. ग्रामिण भागात या सणाला केवढे महत्त्व असते आणि त्यादिवशी गरिब असो वा श्रीमंत गावातल्या प्रत्येक स्त्रीच्या शिरावर केवढी मोठी जबाबदारी असते हे आपल्याला माहित आहेच. हा सण खरोखर स्त्रीचा सण असतो. अशावेळी स्वयंपाकघरात गढून गेलेल्या स्त्रीला अशा सामाजिक प्रश्नासाठी मतदानासाठी घराबाहेर पडणे खरोखर कठीण आहे. याचा परिणाम मिळणाऱ्या मतांवर होणार हे उघड आहे. अशावेळी हाच दिवस मतदानासाठी ठरवला गेला. मात्र महिला हरल्या नाहीत. ग्रामभगिनींनी हिरीरीने उत्सवही साजरा केला आणि मतदानासाठीही आवर्जून उपस्थिती लावली. आणि बहुमतही मिळवले. घरची जबाबदारी पार पाडून गावाच्या समोर उभा असलेला दारूरूपी राक्षस त्यांनी धुळीला मिळवला. तरूणींपासून अगदी म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्याजणींनी एकीचे बळ सिद्ध केले. तब्बल पाचशे चौतीस मतांची आघाडी घेतली. गौरी म्हणून माहेरवाशिणीचे कौतुक सांगणाऱ्या देवीने दुर्गेचे रूप धारण करत दैत्याचा नायनाट केला.
जिथे मांगल्य असते तिथे सरस्वती वास करते असं म्हटलं जातं. दुर्गेचे रूप धारण करून भादोलीतल्या गौरींनी गौरी भोजन संपन्न केलंच आहे. आता अशा पवित्र ठिकाणी सरस्वती आणि त्यापाठोपाठ लक्ष्मीही नक्की कृपादृष्टी ठेवेल...

( या ब्लॉगसाठी साम मराठी वृत्तविभागाचे अनंत सहकार्य मिळाले आहे. साम मराठी वृत्तविभाग आणि कोल्हापूरचे प्रतिनिधी निशिकांत तोडकर यांचे आभार )

Monday, August 24, 2009

गणपती माझा नाचत आला...



एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि, गणेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि..


महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचं आगमन झालं. दहशतवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लोडशेडींग या पाचवीला पुजलेल्या समस्यांबरोबरच स्वाइन फ्लू, महागाई या नव्या संकटांनी भारलेल्या वातावरणात गणेशाचं आगमन झालं. अर्थात आपण इतके सहनशील आहोत की काहीही होवो आपण रडत रडत का होईना पण सण साजरा करतो. संकटं दूर होवोत न होवोत त्यांना तोंड देण्याची शक्ती गणराय आपल्याला नक्की देतो..

आजच्या या लेखाचा सूर थोडा निराशावादी वाटेल खरा.. पण परिस्थिती निराशावादी आहे. सण साजरा करताना आपण या सणाला विकृत स्वरूपापर्यंत पोहोचवले आहे याची जाणीव आपल्याला होतेय का.. हा उत्सव बाजारू स्वरूपात साजरा होतोय. आपल्याला कल्पना येत नाहीये पण आपण फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करत आहोत. उत्सव साजरा झाला पाहिजे पण आपल्या उत्सवी स्वरूपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टाळलाच पाहीजे. इथे एक घटना मला लिहाविशी वाटते..


मार्च २०००.. डोंबिवलीत आमच्या घराजवळ एमआयडीसी विभागातला गणेश विसर्जन तलाव आहे. या तलावाचा उपसा सुरू होता. तलावाचा उपसा करताना विसर्जन झालेल्या हजारो गणेशमुर्तींचा ढिग बाहेर काढला गेले. आणि अत्यंत वाईट अवस्थेतल्या हजारो मुर्तींचा ढिग.. तो ढिगारा पाहून मनाचा थरकाप उडाला.. मग जाणीव झाली याच मुर्तीत आहे आपणही विसर्जित केलेली एक मुर्ती. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यात विरघळत नाहीत. आणि वर्षानुवर्ष तशाच पडून राहतात. या मुर्तींना लावलेले रंग जलाचरांसाठी घातक असतात. त्यामुळे त्या तलावात एकही मासा नव्हता किंवा कोणताही जलचर नव्हता.. रंगामुळे जगणंच शक्य नाही.. त्या दिवशी आम्ही ठरवलं की आपला गणपती यापुढे अशा पाण्यात विसर्जित होणार नाही. आमच्या उत्सवामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही हा निश्चय आम्ही केला.

तातडीने एक चांदीची मुर्ती आणली. आणि तिची स्थापना आम्ही करतो.. दिडदिवसांनंतर बादलीत मुर्तीचं विसर्जन करतो आणि ते पाणी झाडांना घालतो..


उत्सव साजरा जरूर व्हावा पण त्यासाठी आमच्या अमोल पृथ्वीचा आम्ही का बळी द्यावा.. हा हक्क आम्हाला कोणी दिला.
गणेश विसर्जनानंतर नाल्यांमध्ये साचतो थर्माकोलचा ढिग.. किनाऱ्यांवर साचतात मुर्त्यांचे ढिग.. गणेश विसर्जन करून देणाऱ्या पोरांना विचारा त्यांना पाण्यात पायाखाली काय लागतं.. त्यांचं उत्तर तुम्हालाही माहित आहे.. त्यांच्या पायाखाली काय लागतं हे आपण जाणतो तरीही आपण आपली मुर्तीही तिथेच का पाठवतो.. मुर्तीही मातीचीच हवी असे धर्मशास्त्रात सांगितले असेल तर धर्मशास्त्र बदला.. आमचा धर्म आम्ही ठरवू इतका लवचिक हवा.. आणि तो आहेही... मग त्याचा वापर आम्ही कधी करणार... अक्षरशः कायदे करून या मुर्ती बंद करा.. यामुळे मुर्तीकारांच्या पोटाचं काय असा भुक्कड युक्तीवादही होईल, पण मुठभर मुर्तीकारांसाठी आम्ही आमच्या पृथ्वीच्या जीवावर का उठावं..
पर्यावरण संवर्धन वगैरे शब्द फार बोजड वाटतील, पण आपण आणतो त्यामुर्तींनी आपल्याच परिसराला हानी होणार नाही याची काळजी घ्यावी एवढी माफक अपेक्षा आहे. ही जाणीव आलीच पाहीजे.. गणपतीत निर्माण होणाऱ्या निर्माल्यापासून आपण खत निर्मिती करू शकतो. डोंबिवलीत तसा निर्माल्य खत प्रकल्पही आहे. मात्र निर्माल्य पाण्यात टाकले पाहीजे ही वेडगळ संकल्पना धर्माच्या नावाखाली कोणीतरी पसरवली आहे आणि आम्हीही तिच्याच नादाला लागलोय. हे थांबलं पाहीजे, घाणेरड्या खाडीत, दुषित नदीत आम्ही आमचा गणपती विसर्जित करतो हे थांबले पाहीजे.. परिसर, पर्यावरण यांचा आदर केलाच पाहीजे.. ही जाणीव प्रत्येकाला आलीच पाहीजे.. यावर विचारमंथन झाले पाहीजे.. कायद्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः सुज्ञ होऊन वेळीच काही आचार सुधारले तर पर्यावरणाचा नाश आपण टाळणे शक्य होईल.. तेव्हाच गणपतीसमोर आपण मोकळ्या मनाने प्रार्थना करू..



काले वर्षतू पर्जन्यः पृथ्वीसस्यशालिनी...

Friday, August 21, 2009

जाणीव...

जाणीव... ब्लॉग लिहावा.. ब्लॉगिंग करावं असं मला वाटलं तेव्हा तातडीने ब्लॉग पेज तयार केलं, मात्र घोडं नावावर अडलं होतं. नाव काय द्यावं. विचार केला खुप आणि हे नाव सुचलं. जाणीव... जाणीव आहे म्हणून आपण जिवंत आहोत. संवेदना, असंही मनात आलं होतं. मात्र जाणीव त्याच्यापेक्षाही जास्त जवळचं वाटलं.. जगात पाऊल ठेवल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असते ती जाणीव.. जाणीव संपली की सगळं संपलं.. जिवंतपणाचं लक्षण.
जन्माला आल्याआल्या विश्वात आल्याची जाणीव.. आईसोबत आहे याची जाणीव.. भुकेची जाणीव, झोपेची जाणीव, स्पर्शाची जाणीव, इथपासून या क्षणापर्यंत प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत असते ती आपली जाणीव.. हीच जाणीव सोबत आहे आणि प्रत्येक क्षणाला राहील हे लक्षात घेऊन या ब्लॉगला नाव दिलं जाणीव.. असो ब्लॉगचा नामकरण विधी तर झालाय, आता पाहूया लिहायला काय काय सुचतंय. तुर्तास तरी इथेच थांबावं हे उत्तम....